
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बंगळुरूमध्ये भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रजनीकांत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता, निर्माता मोहन बाबू उपस्थित होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित किस्से अनेक मान्यवरांनी सांगितलं. पण रजनीकांत यांनी केलेलं भाषण मात्र संस्मरणीय ठरलं. रजनीकांत यांच्या भाषणाचा व्हिडिओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आपला इगो कसा संपला, याचा किस्साच त्यांनी खुल्या मनाने शेअर केला आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बंगळुरूत आर्ट ऑफ लिव्हिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रजनीकांत यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण केलं. मला या आश्रमात राहायला आवडतं. या ठिकाणी हिरवळ आहे. झरे आहेत. गायी आहेत. अनेक प्राणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आश्रमातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि हास्य आहे. मला या ठिकाणी यायला सांगितलं गेलं. पण मी आधी कानाडोळा केला. पण नंतर मी दोन दिवस राहायचं ठरवून आलो. पण या ठिकाणचं शांतीमय वातावरण पाहून मी 15 दिवस थांबलो. मी हिमालयात जाऊन आलोय. पण या ठिकाणी आल्यावर माझ्या मनाला प्रचंड शांतता मिळाली आहे. अशी शांतता दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही, असं रजनीकांत म्हणाले.
आणि इगो…
यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या इगोविषयीही भाष्य केलं. एकेदिवशी गुरुदेवांनी (श्री श्री रविशंकर) मला सत्संगात यायला सांगितलं. मी त्यांनी आधी मना केलं. मी आल्यावर तिथे गोंधळ उडेल, डिस्टर्बन्स होईल, असं सांगितलं. मला वाटलं मी आल्यावर माझे फॅन धावतपळत येतील. रजनी रजनी असा जयघोष करतील. माझी सही घेण्यासाठी धडपड करतील. आणि माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडेल. त्यामुळे सत्संगात गोंधळ उडेल असं मला वाटलं. कारण सत्संगात असंख्य तामिळ लोक होते.
पण गुरुदेव म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत या. काहीच गोंधळ होणार नाही. गुरुदेवांच्या शब्दाला मान देऊन मी त्यांच्यासोबत गेलो. पण तिथे गेल्यानंतर माझा इगोच गळून पडला. कारण सत्संगात 10 ते 15 हजार लोक होते. प्रचंड गर्दी होती. गुरुदेवांभोवती मोठा गराडा पडला होता. पण एकाही व्यक्तीने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी बळेबळेच हात उंचावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच माझ्याकडे पाहत नव्हतं. मी असंख्य कार्यक्रमात भाग घेतला. माझ्या भोवतीची गर्दी पाहिली. पण त्या दिवशी गुरुदेवांसोबत असताना सर्व गुरुदेवांकडेच पाहत होते. माझ्याकडे कोणीच पाहत नव्हतं. त्याच क्षणी माझा अहंकार गळून पडाला. मी मनाने डिस्टर्ब झालो, असं रजनीकांत यांनी सांगितलं.
आश्चर्यकारक अनुभव
माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता. आश्चर्यकारक होता. मी मोठमोठे नेते आणि उद्योगपतींना भेटलोय. पण आश्रमातील या अनुभवाने मला आतूनबाहेरून बदलून टाकलं, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर रजनीकांत हसून म्हणाले की, गुरुदेव म्हणाले होते काही डिस्टर्बन्स होणार नाही. पण या घटनेने माझं डोकं मात्र हललं. मेंदूत डिस्टर्बन्स सुरू झाला. रजनीकांत यांनी हा किस्सा ऐकवताच भक्तांनी टाळ्या वाजवून दाद दिली.