
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजयImage Credit source: Instagram
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले सी. जोसेफ विजय (थलपती विजय) सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहेत. थलपती विजय यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील डीएमके सरकारचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. डीएमके सरकारने मंदिरांच्या निधीतून 46 प्रकल्पांना मंजुरी दिली होती. तर मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारने हे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. मंदिराची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता ही केवळ पवित्र कार्यांसाठीच वापरली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी मागील सरकारने मंजूर केलेले 46 प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. थलपती विजय यांच्या या निर्णयाचं सध्या कौतुक होत आहे.
46 प्रकल्प रद्द
मुख्यमंत्री विजय यांच्या मंजुरीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेला हा आदेश आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. डीएमके सरकारने मंदिरांच्या निधीतून 246 कोटी रुपये खर्चाने 29 विवाह सभागृह आणि 17 व्यावसायिक संकुलांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती. विजय यांच्या आदेशात म्हटलंय की, 46 प्रकल्पांचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. मंदिराची आर्थिक परिस्थिती पाहता प्रकल्पाला दिलेल्या या मंजुऱ्या रद्द केल्या जात आहेत.
निर्णयाचं कौतुक
गेल्या बऱ्याच काळापासून हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागांतर्गत येणाऱ्या मंदिरांच्या निधीचा वापर विवाह सभागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संस्था बांधण्यासाठी केला जात होता. अनेक उजव्या विचारसरणीच्या आणि हिंदू संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. 2025 मध्ये एआयएडीएमकेचे सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी व्यावसायिक कामांसाठी मंदिराचा निधी खर्च करण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मंदिरांचा निधी केवळ मंदिरांशी संबंधित कामांसाठीच वापरला जावा, अशी मागणी केली जात होती. आता मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेल्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी लढणाऱ्या अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) या पक्षाने 234 पैकी 104 जागांवर विजय मिळवला आहे. संपूर्ण देशभरात त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीची चर्चा आणि कौतुक झालं होतं.