
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाल्यामुळे भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अशातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी असं एक विधान केले आहे, ज्यामुळे आता इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही थेट घोषणा करण्यात आलेली नसली तरी मंत्री यांच्या वक्तव्यातून भविष्यातील इंधन दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या स्थितीवर अवलंबून असतील, असे संकेत मिळाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जागतिक ऊर्जा बाजारावर सरकारची बारकाईने नजर
केरळमधील त्रिशूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सुरेश गोपी यांनी सांगितले की, ‘केंद्र सरकार सध्या जागतिक ऊर्जा बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल करताना कच्च्या तेलाची उपलब्धता आणि त्याच्या पुरवठ्याची स्थिरता यांचा विचार केला जाईल.’ इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, ‘सर्वप्रथम कच्च्या तेलाचा पुरवठा कसा राहतो हे पाहणे आवश्यक आहे. त्यानंतरच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि संबंधित मंत्रालय अंतिम निर्णय घेतील.’
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम
गेल्या काही काळापासून मध्यपूर्वेतील भागातील वाढता तणाव आणि संघर्ष यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या प्रदेशातून केला जातो. या भागातील कोणतीही भू-राजकीय अस्थिरता कच्च्या तेलाच्या किमती वाढवू शकते. त्याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशांवर होतो. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर देशांतर्गत इंधनाचा खर्चही वाढतो. त्यामुळे आता आगमी काळात जर जागतिक बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या तर भारतातही पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते.