
गरम-गरम पाव, त्यात चमचमीत बटाटा वडा, सोबत झणझणीत चटणी आणि तो तोंडाला पाणी आणणारा कुरकुरीत चुरा… तोंडाला पाणी सुटलं ना… गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वडापावने आता थेट सातासमुद्रापार आपला डंका वाजवला आहे. जगभरातील पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांचे मानांकन करणाऱ्या टेस्टॲटलस (TasteAtlas) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने जगातील सर्वोत्तम सँडविचची यादी जाहीर केली आहे. या मानाच्या जागतिक शर्यतीत लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्कच्या महागड्या पदार्थांना मागे टाकत, मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध अशोक वडापावने स्थान मिळवले आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराची मान अभिमानाने उंचावली आहे.
किर्ती कॉलेजचा प्रसिद्ध अशोक वडापाव
दादर येथील किर्ती कॉलेजच्या अगदी जवळ असल्यामुळे हा स्टॉल किर्ती कॉलेजचा वडापाव म्हणूनही जगप्रसिद्ध आहे. गेल्या पाच ते सहा दशकांपासून म्हणजेच साधारण ५० वर्षांहून अधिक काळ हा वडापाव मुंबईकरांच्या मनावर राज्य करत आहे. या स्टॉलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वर्षांनंतरही त्यांनी आपल्या वडापावची मूळ चव आणि गुणवत्ता तसूभरही बदलू दिलेली नाही. चटणी, गरम वडा आणि सोबत मिळणारा विशेष चुरा यामुळे हा वडापाव खाण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे गर्दी करतात.
आता याच वडापावला जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत स्थान मिळाले आहे. जगभरातील पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांचे मानांकन करणाऱ्या ‘टेस्टॲटलस’ (TasteAtlas) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने जगातील सर्वोत्तम सँडविचची यादी जाहीर केली आहे. या मानाच्या मुंबईतील प्रसिद्ध अशोक वडापावने २५ वे स्थान पटकावून नवा इतिहास रचला आहे. टेस्टॲटलसने या वडापावला ४.१-स्टार रेटिंग दिले आहे.
खवय्येप्रेमींना भुरळ
मुंबईच्या वडापावचे वैशिष्ट्य म्हणजे हा पदार्थ केवळ चवीपुरता मर्यादित नसून तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि सहज उपलब्ध होणारा आहे. मजुरांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि लक्षाधीशपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एकाच रांगेत उभे राहून या वडापावचा आस्वाद घेताना दिसतात. असे म्हटले जाते की, या वडापावची सुरुवात १९६६ मध्ये दादर रेल्वे स्टेशनबाहेरील एका स्टॉलवर झाली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला व्यवसायात उतरवण्यासाठी दिलेल्या प्रेरणेतून हा पदार्थ पुढे आला आणि पाहता पाहता तो मुंबईची ओळख बनला.
मुंबईतून थेट जागतिक पातळीवर झेप
एक काळ असा होता जेव्हा वडापाव फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरापुरता मर्यादित होता. मात्र, आता त्याने देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. आज दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरुसारख्या मेट्रो शहरांमध्येही मुंबईच्या वडापावला मोठी मागणी आहे. आता तर टेस्टॲटलसच्या जागतिक मानांकनामुळे हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आंतरराष्ट्रीय खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या मानांकनामुळे मुंबईच्या या मराठमोळ्या स्ट्रीट फूडला आता एक नवी आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. सध्या सोशल मीडिया आणि खाद्यप्रेमींमध्ये याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.