
राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे मित्रपक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपसोबत युती तोडण्यावरही भाष्य केले होते. याला आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी उत्तर दिले आहे.
सत्तारांचा भाजपवर आरोप
अब्दुल सत्तार यांनी,’जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल आमचे मुकुट गेले. आता छोट्या मोठ्या निवडणुकांमध्येही भाजपा लक्ष घालून आमच्या मध्ये दोन गट कसे पडतील हे पाहत आहे. आमचे मुंडके सत्तेपासून बाजूला केले, आता हळूहळू आमचे मुंडके छाटण्याचे काम सुरू आहे. कालचे नेते शिवसेना कमकुवत करण्याचे काम करत आहेत. मोठा भाऊ युती संपवत आहे’ असा आरोप करत युती संपवण्याची भाषा केली होती. याला आता महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सत्तार आता मोठे नेते झाले आहेत – महाजन
गिरीष यांना अब्दुल सत्तार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘अब्दुल सत्तार सध्या शिवसेनेचे खूप मोठे नेते झाले आहेत. ते तर आता युती ठेवायची की नाही यावर विचार करायला लागले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा घास कशाला घ्यायला पाहिजे. आपण आपल्यापुरतं बोला, जिल्ह्यापुरतं बोला. युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल सत्तार असं बोलत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये असा माझा त्यांना सल्ला आहे.’
मिठाचा खडा टाकू नये
पुढे बोलताना गिरीष महाजन यांनी म्हटले की, युती बाबत बोलण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. सत्तार साहेब सध्या आमदार आहेत, त्यांनी असं बोलून महायुतीत मिठाचा खडा टाकू नये. यामुळे होणार काही नाही, पण अशी विधाने टाळावीत असा सल्ला महाजन यांनी सत्तार यांना दिला आहे.