
संजू सॅमसन नाही तर जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी! एबी डिव्हिलियर्स म्हणाला..Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 96 धावांनी मात दिली. या सामन्यात संजू सॅमसनने 89 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनने करो या मरोच्या तिन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या हे विशेष.. त्यामुळे टीम इंडियाने सुपर 8 मधून उपांत्य फेरीत, उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत आणि अंतिम फेरीत जेतेपद मिळवलं. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलं गेलं. पण असं असूनही एबी डिव्हिलियर्सच्या मते, हा पुरस्कार जसप्रीत बुमराहचा आहे. त्याने त्यामागचं कारणही सांगितलं. एबी डिव्हिलियर्सच्या मते, भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी करणं सोपं नव्हतं. जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात एकूण 14 विकेट काढल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.21 प्रति षटक होता. जसप्रीत बुमराहने अंतिम सामन्यात 15 धावा देत 4 गडी बाद केले. त्यामुळेच त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरविण्यात आलं. पण तो प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी होता.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, ‘संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांच्यात अतितटीची लढत होती. बुमराह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यामुळे प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या शर्यतीत होता. पण माझ्या मते, त्याने महत्त्वाच्या आणि कठीण प्रसंगी चांगली कामगिरी केली. त्यामुळे तो या पुरस्काराचा मानकरी होता.’ भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजी करणं वाटते तितकं सोपं नाही, असंही एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला. ‘भारतात वेगवान गोलंदाज होणं सोपं नाही. जर तु्म्ही जसप्रीत बुमराह नसाल. स्पर्धेच्या काही सामन्यात तो देखील महाग ठरला. पण जेव्हा उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना आला तेव्हा त्याने चांगली गोलंदाजी केली. मी यापूर्वी असं कधीच पाहिलं नाही. बुमराह हा वेगळ्या जगातील खेळाडू असून भारताचा रत्न आहे.’
संजू सॅमसनला पुरस्कार का?
संजू सॅमसनने महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला धावा करून दिल्या. त्यामुळे गोलंदाजांवरील प्रेशर कमी झालं. सुपर 8 च्या वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. त्यामुळे 196 धावांचा यशस्वी पाठलाग करता आला. संजू सॅमसनने 5 सामन्यात 80.25 च्या सरासरीने 321 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तिन्ही अर्धशतकं महत्त्वाच्या सामन्यात ठोकली.