
ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक करुन परतत होते. या हल्ल्याच्यावेळी डीआयजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. ताफ्याचा भाग असलेल्या एका गाडीला आग लागली.
गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. आंदोलक निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या नामंकन प्रक्रियेच्या सहभागाला विरोध करत होते. मंगळवारी चिबिनांग क्षेत्रात झडपा झाल्या. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले.
सैन्याच्या पाच तुकड्या तैनात
या हिंसाचारामुळे गारो पर्वतीय क्षेत्रात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात तीन तुरामध्ये आणि दोन चिबिनांग क्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी 10 एप्रिलला प्रस्तावित असलेली GHADC निवडणूक स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
कर्फ्यू लावला
अफवा रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने गारो पर्वतीय क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा निलंबित केली आहे. पश्चिम गारो पर्वतीय जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्याचे उपायुक्त वी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू 13 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहिलं. गारो पर्वतीय क्षेत्रातील संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.