
अहमदाबादहून मुंबईत आलेल्या हिंदू मुलींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी कुरार पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.अहमदाबादहून आपल्या नातेवाईकांना भेटायला मुंबईत आलेल्या दोन हिंदू मुलींना मालाड पूर्वमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादातून काही मुस्लिम मुली आणि तरुणांनी मारहाण केली होती.
घटनेनंतर कुरार पोलिसांनी 10 ते 12 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, ज्याअंतर्गत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यात मुलींचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, शिवसेना नेते संजय निरुपम दोन दिवसांपूर्वी तिथे गेले होते आणि त्यांनी सर्व आरोपींना अटक करण्याचा पोलिसांना इशारा दिला होता. आज पुन्हा एकदा संजय निरुपम पोलीस ठाण्यात पोहोचले आणि अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
कुरारच्या पठाणवाडीमधून काही मुलं तिथे आली
मालाड रेल्वे स्टेशनजवळ शेअर रिक्षात बसण्याच्या क्षुल्लक भांडणावरुन इतका मोठा हा वाद झाला. संध्याकाळच्यावेळी या मुलींचं रिक्षात बसण्यावरुन एका मुस्लिम महिलेसोबत वाद झाला. गुजरातवरुन आलेलं हे कुटुंब शॉपिंगसाठी मालाड येथे गेलं होतं. शेअर ऑटोसाठी ते रांगेत थांबलेले. या कुटुंबाच्या जवळच्या एका महिलेने सांगितलं की, मुली रांगेत पुढे उभ्या होत्या. बुरखा परिधान केलेल्या महिलेची आणि त्यांची तिथे वादावादी झाली. या शाब्दीक भांडणाचं पुढे मोठ्या वादावादीत रुपांतर झालं. कुरारच्या पठाणवाडीमधून काही मुलं तिथे आली आणि वाद आणखी भडकला.