
भारताची एअर डिफेन्स सिस्टिम मजबूत करण्याच्या दिशेने संरक्षण मंत्रालयाने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच 30 हजार कोटीच्या स्वदेशी ‘अनंत शस्त्र’ प्रणालीच्या उत्पादनाला अंतिम मंजुरी मिळू शकते. ‘अनंत शस्त्र’ ही क्विक रिएक्शन सरफेस-टू-एयर मिसाइल (QRSAM) प्रणाली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे. DRDO ने विकसित केलेल्या या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमने सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आता भारतीय सैन्यात या शस्त्राचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ‘अनंत शस्त्र’ सैन्याची जुनी OSA-AK एअर डिफेन्स सिस्टिमची जागा घेणार आहे. QRSAM सिस्टिम कमी उंचीवरुन उडणारे ड्रोन्स, हेलिकॉप्टर, फायटर जेट्स, क्रूज मिसाइल नष्ट करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
ही सिस्टिम 8×8 हाय-मोबिलिटी वाहनावर आधारित आहे. युद्ध क्षेत्रात वेगाने ही सिस्टिम तैनात करता येऊ शकते. यात आधुनिक रडार, फायर कंट्रोल सिस्टिम, इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेंसर आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर सारख्या हाय-टेक टेक्नेलॉजी आहे. हवाई हल्ला ओळखून तो वेळेत नष्ट करणं ही या सिस्टिमची खासियत आहे. या प्रकल्पात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) प्रमुख उत्पादन कंपनी आहे. भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मिसाइल निर्मिती करेल. लार्सन अँड टुब्रो (L&T) मोबाइल लॉन्चर वाहनांची निर्मिती करेल. ही सिस्टिम संपूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजीवर आधारित आहे.
भारतीय सैन्याच्या कुठल्या युनिटला फायदा होईल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन एअर फोर्सने या सिस्टिममध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. भविष्यात दिल्ली-NCR बहुस्तरीय एअर डिफेन्स सिस्टिमचा ही सिस्टिम भाग बनू शकते. S-400 आणि अन्य एअर डिफेन्स सिस्टिम सोबत मिळून QRSAM देशाची हवाई सुरक्षा अधिक अभेद्य बनवेल. ‘अनंत शस्त्र’ समावेशामुळे भारताच्या सैन्याच्या आघाडीवरील आणि मोबाइल फॉर्मेशनला हवाई हल्ल्यापासून संरक्षण मिळेल. सोबतच पाकिस्तान आणि चीनकडून मिळणाऱ्या हवाई आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला करण्याची क्षमता वाढेल. मिशन सुदर्शन चक्र हे भारताचं मुख्य लक्ष्य आहे. या मिशनमध्ये बहुस्तरीय एअर डिफेन्स सिस्टिम असतील.