
रील बनवण्याच्या नादात पाच मुलांवर मोठं संकट ओढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील असून काशीराम आवासीय कॉलनीतील सुमारे 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर ही मुलं चढली होती. रील शूट करून खाली उतरत असताना तिघे एकाच शिडीवर आल्याने शिडी तुटली आणि तिघे खाली कोसळले. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उरलेले दोघे टाकीवरच अडकले होते.
दरम्यान, उर्वरित दोन मुलं टाकीवरच अडकून पडले असताना त्यांना सुरक्षित खाली आणण्यासाठी सुमारे 16 तास बचावकार्य सुरू होते. घटनास्थळी जिल्हाधिकारी (DM), अतिरिक्त जिल्हाधिकारी (ADM) आणि पोलीस अधीक्षक (ASP) यांच्यासह पथक उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.