
तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 54 व्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान देता आलं. तर इतर प्रमुख फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात भुवनेश्वर कुमार याने प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे आता आरसीबी विजयी आव्हान पूर्ण करत प्लेऑफचा दावा आणखी मजबूत करणार की मुंबई गेल्या पराभवाची परतफेड करणार? याचं उत्तर हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुंबईची बॅटिंग
आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या पहिल्या 7 पैकी दोघांचा अपवाद वगळता इतर 5 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतरांना काही करता आलं नाही. रायन रिकेल्टन याने निराशा केली. रायनने 2 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याला भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्मा चांगला खेळत होता. मात्र रोहितच्या खेळीचा शेवट झाला. रोहितने 10 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
नमन-तिलकची निर्णायक भागीदारी
त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्मा या दोघांनी 50+ पार्टनरशीप करुन मुंबईला 150 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 57 बॉलमध्ये 82 रन्स जोडल्या. नमन धीर आऊट होताच ही जोडी फुटली. नमनने 32 बॉलमध्ये 47 रन्स केल्या. नमनचं अर्धशतक अवघ्या 3 धावेने हुकलं. मात्र तिलक वर्माने अर्धशतक झळकावलं. मात्र तिलकला अर्धशतकानंतर फार धावा करता आल्या नाहीत. तिलकने सर्वाधिक 57 धावा जोडल्या. तिलकने या खेळीत 42 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.
लाईव्ह स्कोअरकार्ड
विल जॅक्स याने 10 धावा जोडल्या. तर राज बावा याने 16 रन्स केल्या. तर कॉर्बिन बॉश आणि दीपक चाहर हे दोघे नॉट आऊट परतले. कॉर्बिनने 5 तर दीपकने 1 धाव जोडली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर जोश हेझलवूड, रसीख सलाम डार आणि रोमरिया शेफर्ड या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.