
सदावर्तेंची जरांगे पाटलांवर जोरदार टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न घेतला नाही. ते राजकीय नखरे ठेऊन आंदोलन करत आहेत. त्यांनी माझ्या मराठी बांधवांचा अपमान केला आहे. जरांगे पाटील हे मराठा बांधवांचे नेते असूच शकत नाहीत, मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात. उदय सामंत हे नेहमी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटत असतात, असा थेट आरोपच गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. जरांगे पाटील हे मराठा बांधवांचे नेते असूच शकत नाहीत, मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात. उदय सामंत हे नेहमी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटत असतात असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. जरांगे हे कधीच संविधानावर बोलत नाही, मनोज जरांगे पाटील हे फक्त मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू शकतात. मनोज जरांगे पाटील यांनी लोकांना त्रास दिला आहे, हे लोक कायम लक्षात ठेवतील. मराठा कास्ट व्हॅलेडीटी ही बाकीच्या जाती प्रमाणेच करावी लागते, माझ्या मराठी बांधवाना फसवण्याचा हा डाव आहे, असा हल्लाबोल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती, या बैठकीवर देखील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये आज वाळूचा बेकायदेशीर उपसा कराणाऱ्या लोकांची बैठक होती, जरांगे पाटील हे कधीच मराठा समाजासाठी उभे राहिले नाहीत मी थेट बोलतोय एकनाथ शिंदे यांनी जारांगे यांना आवार घालावा, उदय सामंत यांच्या कडून जारांगे यांना मेसेज द्यावा, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.