
आजच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत महिलाकेंद्रित कथांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. एकेकाळी फक्त नायकाभोवती फिरणाऱ्या कथा आता बदलत असून, महिला पात्रे स्वतःच्या संघर्षाची, स्वप्नांची आणि अस्तित्वाची कहाणी ताकदीने मांडताना दिसत आहेत. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या काही उत्कृष्ट हिंदी चित्रपटांनी समाजातील महिलांच्या वास्तवाला अतिशय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आणले आहे.
ज्यामध्ये‘लापता लेडीज’, ‘गंगूबाई काठियावाड़ी’ ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’, ‘दो पत्ती’, ‘उलझ’ आणि ‘मिमी’ हे चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, सामाजिक दबाव, मातृत्व, ओळख आणि अन्यायाविरुद्धची लढाई यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करतात.
‘लापता लेडीज’
दिग्दर्शिका किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने साधी पण हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणली. दोन नववधू ट्रेनच्या प्रवासात चुकून एकमेकींपासून वेगळ्या होतात आणि त्यानंतर सुरू होतो त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ देणारा प्रवास.
चित्रपट विनोदी शैलीत पुढे जात असला तरी महिलांच्या स्वातंत्र्याचा, आत्मविश्वासाचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या संघर्षाचा अतिशय सुंदर संदेश देतो. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही ही कथा प्रत्येक महिलेला स्वतःचा आवाज शोधण्याची प्रेरणा देते.
‘गंगूबाई काठियावाडी’
आलिया भट्ट अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी’ ही एका वास्तविक व्यक्तीच्या जीवनावर आधारित प्रभावी कथा आहे. वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलली गेलेली एक तरुणी पुढे कमाठीपुराची ताकदवान नेत्या कशी बनते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
‘मिमी’
क्रिती सॅनॉन स्टारर ‘मिमी’ हा चित्रपट सरोगसीसारख्या संवेदनशील विषयावर आधारित आहे. सुरुवातीला हलक्याफुलक्या पद्धतीने मांडलेली कथा पुढे अत्यंत भावनिक वळण घेते. एका मुलीसाठी पैसे कमावण्याचे साधन म्हणून सुरू झालेला प्रवास अखेरीस मातृत्वाच्या खऱ्या अर्थाची जाणीव करून देतो. समाजातील पूर्वग्रह, आईचे प्रेम आणि जबाबदारी यांचे सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’
राणी मुखर्जी यांच्या अभिनयाने सजलेला ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. परदेशातील कायदेशीर व्यवस्थेविरोधात उभी ठाकलेली एक भारतीय आई आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी किती मोठी लढाई लढते, हे यात दाखवले आहे.
तर ‘दो पत्ती’ हा सस्पेन्स थ्रिलर घरेलू हिंसा, मानसिक आघात आणि नात्यांमधील गुंतागुंत यांसारख्या विषयांवर भाष्य करतो. तर Ulajh हा राजकारण, दबाव आणि षड्यंत्रांच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची धैर्यपूर्ण कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.