
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटीमध्ये आज सुरू असलेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाच्या नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील आकडेवारीवरून जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे समितीवर नाराजी व्यक्त केली.
बैठकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपलब्ध सर्व नोंदींची आकडेवारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी “काही नोंदी कम्प्युटरमधून गायब झाल्या आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. तसेच शिंदे समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी जरांगे पाटील यांनी फोनवरून थेट संवाद साधला.
या संवादादरम्यान जरांगे पाटील यांनी “58 लाख नोंदींचा संपूर्ण डेटा नावासह आम्हाला द्या,” अशी ठाम मागणी केली. याच मुद्द्यावरून त्यांनी शिंदे समितीवर संताप व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही व्यक्तींच्या नावावर 15 ते 20 नोंदी असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, “साहेब, तुमचं आणि आमचं जमत नाही, मी उपोषणाला बसतो.”
मराठा आरक्षण आणि नोंदींच्या मुद्द्यावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.