
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देऊन भुजबळ यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. भाजपचा विरोध असल्यानेच भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. आता छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी पडद्यामागे नेमकं काय घडलं? हे सांगितलं आहे.
समीर भुजबळ नेमकं काय म्हणाले?
भुजबळ समर्थक आणि पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते सध्या नाराज असल्याचे चित्र आहे. दरम्यान, समीर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना पडद्यामागील A टू Z घडामोडी सांगितल्या आहेत. ‘राज्यसभेवर जाण्याची इच्छा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती आणि तशी मागणी पण केली होती. पण त्या जागेवर पक्षाकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली आहे. आम्ही देखील पक्षात स्थापनेपासून काम करत आहोत या पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिली सभा शिवाजी पार्क मैदानात घेण्यात आली. त्यासाठी आम्ही खूप कष्ट केले आहेत आणि या पक्षाच्या झेंड्याच्या कामासाठी असेल किंवा पक्ष दिल्लीच्या निवडणूक आयोगात रजिस्ट्रर करेपर्यंत आम्ही काम केल आहे’ असे समीर भुजबळ म्हणाले.
पुढे ते म्हणाले, त्यामुळे भुजबळ साहेबांनी अट टाकली होती की मी राज्यसभेवर गेलो तर माझे मंत्रीपद हे मला देण्यात यावं म्हणून. पण त्यावर भाजप केंद्रातून नेतृत्वाकडून नकार काही आला नाही आहे. त्यांनी सांगितल की विस्तार होत असताना संधी मिळेल म्हणून. पण आता राज्यसभेवर राजेंद्र जैन यांना संधी मिळाली आहे. आज नाही तर उद्या मला संधी मिळेल. मी काही पक्षात नाराज नाही आहे. आमच्या पक्षातील बुद्धिबळाचे खेळाडू कोण आहेत यासंदर्भात सूचक विधान भुजबळ साहेबांनी केल आहे.
दरम्यान, भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी ‘साहेब, निर्णय घ्या’ असे पोस्टर्स लावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका कार्यकर्त्याने सांगितले, “कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली आहे की, आता साहेबांनी निर्णय घ्यावा. ही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याबाबत आम्ही काय बोलणार?”