
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील एलपीजी सिलेंडर सबसिडीच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नव्या नियमानुसार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता वर्षभरात केवळ 4 एलपीजी सिलेंडरवरच सबसिडी मिळणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना 9 सिलेंडरपर्यंत अनुदानाचा लाभ दिला जात होता.
या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तीव्र टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले. “चार सिलेंडर संपल्यानंतर महिलांनी उर्वरित काळात काय करायचे, हे भाजपने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
सचिन सावंत म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू करताना चुलीवरील धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा मांडला होता. महिलांच्या डोळ्यांना, नाकाला आणि आरोग्याला धुरामुळे त्रास होतो, त्यामुळे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र आता केवळ चार सिलेंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतल्याने उर्वरित महिन्यांमध्ये महिलांनी काय वापरावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“जर महिलांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायचा असेल, तर त्या धुराचा आरोग्यावर होणारा परिणाम सरकारला मान्य आहे का?” असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला. त्यांनी या निर्णयाला सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका करत, गरीब आणि ग्रामीण भागातील महिलांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, उज्ज्वला योजनेतील सबसिडी कपातीच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.