
कल्याणमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून, स्मार्ट मीटर सक्ती, वीजदरवाढ आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून आंदोलन छेडण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कल्याणमधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनादरम्यान शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. तसेच स्मार्ट मीटर सक्ती, वाढते वीजदर आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय मागे घ्यावा तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. शिवसेनेकडून नागरिकांच्या प्रश्नांवर लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.