Headlines

Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण…भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!

Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण…भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण…भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!


राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते भास्कर जाधव, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. सरकारच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांनी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा इशारा दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव यांनी राज्यासमोर उभ्या असलेल्या दुष्काळाच्या संभाव्य संकटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्य सरकारने यापूर्वीच ‘एल निनो’मुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणती ठोस तयारी केली आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारची कार्यपद्धती आता सुधारण्याच्या पलीकडे गेली असल्याची टीकाही त्यांनी केली.

शेतकरी प्रश्नावर बोलताना जाधव म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. सरकार कर्जमाफीचा दावा करत असले तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या कर्जमाफीबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

‘लाडकी बहीण’ योजनेवरूनही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. केवायसी सक्तीमुळे लाखो महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही योजना केवळ निवडणुकीसाठीच आणली होती का, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेल्या महिलांचे काय होणार, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

याशिवाय अलीकडील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये फळबागांचे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी महाविकास आघाडीने केली.

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळ, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि राज्यातील आर्थिक स्थिती यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळाले.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *