
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. सरकारकडे पैसे नसताना विविध योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचाही दावा त्यांनी केला.
पाण्याच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी एल निनोच्या संभाव्य संकटाची आठवण करून दिली. राज्यासमोर मोठे पाणी संकट उभे राहण्याची शक्यता असूनही सरकारने पाणी साठवण आणि नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. याचा फटका शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय जलजीवन मिशन आणि इतर विकासकामांबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. जलजीवन मिशन, रस्ते विकास आणि इतर प्रकल्पांची मोठ्या प्रमाणावर बिले प्रलंबित असल्याचा दावा करत सरकारने अद्याप अनेक कामांचे पैसे दिले नसल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारकडूनही निधीत कपात झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, आगामी पावसाळी अधिवेशनात पाणीटंचाई, शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे.