
सिद्धार्थ मेनन, जान्हवी Image Credit source: Youtube
प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलं आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची ही भावनिक कथा असून कामाच्या ठिकाणी फुलणारं प्रेम, त्यासोबत येणारी गुंतागुंत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांची प्रभावी मांडणी या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 24 जून 2026 रोजी मराठी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे.
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ची कथा
‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या सीरिजची कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते. कामाच्या ठिकाणी त्या दोघांची अचानकपणे ओळख होते आणि त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळतं. सुरुवातीला सहज आणि नैसर्गिक वाटणारी त्यांची मैत्री हळूहळू अशा नात्यात बदलते, ज्याकडे दुर्लक्ष करणं दोघांनाही शक्य होत नाही. एकमेकांविषयीचं तीव्र आकर्षण, समान स्वप्ने आणि खोल भावनिक नातं यांमुळे ते प्रेमात पडतात.
कुणाच्याही नकळत एकमेकांकडे पाहणं, लांबणाऱ्या गप्पा, कॉफी ब्रेकदरम्यानचे खास क्षण आणि रात्री उशीरापर्यंत होणारे फोन हे अनन्या आणि ऋषी यांच्या आयुष्याचा भाग बनू लागतात. त्यातून दोघांमध्ये एक खास प्रेमाचे नातं निर्माण होऊ लागतं. या नात्यात उत्साह, आनंद तर असतोच, त्यासोबतच अनिश्चितताही असते. मात्र, त्यांचं प्रेम लपवून ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत जातं, कारण कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा, व्यावसायिक मर्यादा, पदानुक्रम आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हे घटक त्यांची परीक्षा घेऊ लागतात.
पहा ट्रेलर
गुंतागुंतीच्या प्रेमाचे रोमांच, मन मोकळे करण्यातील भावनिक असुरक्षितता आणि वैयक्तिक आनंद, व्यावसायिक जबाबदाऱ्या एकमेकांमोर उभ्या ठाकल्यावर घ्यावे लागणारे कठोर निर्णय यांचं चित्रण या सीरिजमध्ये उभं करण्यात आलं आहे. महत्त्वाकांक्षा, आत्मशोध आणि बंद दारांआड जपल्या जाणाऱ्या नात्याचं वास्तव यांचा सामना करताना प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत स्वीकारण्यास अनन्या आणि ऋषी तयार आहेत का, याचा विचार दोघांनाही करावा लागतो.
अनन्याचा प्रवास हा आत्मशोध, खंबीरपणा आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याचा आहे; तर ऋषी नेतृत्व, जबाबदारी आणि भावनिक असुरक्षितता यांसोबत येणाऱ्या आव्हानांचा सामना करत असतो. रोमान्स हा या सीरिजचा केंद्रबिंदू असला तरी व्यावसायिक वातावरणात नाती जपत पुढे जाण्याचं वास्तवही ही कथा मांडते.