
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. जे खासदार फुटले, त्या लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत. खासदार फुटले म्हणून पक्ष संघटना स्थानिक पातळीवर कमकुवत होऊ नये, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये, त्यांच्यामध्ये विश्वास टिकून रहावा यासाठी उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांचे सहाही मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. आज यवतमाळ मधल्या सभेत बोलताना त्यांनी फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतलाच. पण भाजपंवरही जोरदार हल्लाबोला केला. अयोध्येत राम मंदिरात दान चोरीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने SIT नेमली असून कारवाई सुरु आहे. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
“हिंदुंना जागृती आली पाहिजे. आजचा सामनातील अग्रलेख वाचा. मध्ये मध्ये मोर्चा काढणारे झोपले आहेत का? सकल हिंदू समाज वाले कुठे आहेत?. भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत. या विळख्यातून रामाला सोडवण्यात येणार आहे. भोंदूंपासून सोडवणार आहोत. शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रात टाकेल” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये केली. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं.
लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा
“पिकविमा का मिळाला नाही? लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा. राम मंदिर लुटलं जातंय, हे सर्व प्रश्न विचारण्याचं धाडस आहे का गद्दारांना? की गद्दारीने तुमचं रक्त नासलं का? शिवसेना का संपवत आहात, कारण त्यांना कुणी प्रश्न विचारू नये म्हणून. शिवसेना प्रश्न विचारते, त्यांना आवडत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं
“इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे लादलं जाईल ते वाहत राहा. शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. त्याच्या जीवावर सर्व आहेत. मी लढणार आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही. आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं आहे. मंदीर लुटणारं नाही” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.