
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप, शिंदे गट तसेच विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणतेही महत्त्वाचे विधेयक आणण्यापूर्वी केंद्र सरकारने सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी. “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेचे प्रतिनिधी आहोत. आमच्याही सूचना आणि आक्षेप ऐकले गेले पाहिजेत. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही असू शकतो. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले.
“मला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याची काळजी वाटते. महाराष्ट्रातील एखादा नेता पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत असेल तर त्यात काहीच गैर नाही. मात्र, ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येऊ नयेत यासाठी काही राजकीय कारस्थान सुरू आहे का, असा प्रश्न मला पडतो,” असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधान होणार असेल तर त्याला आपला पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डिलिमिटेशन आणि संसदेतील विधेयकांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, महिला आरक्षण तात्काळ लागू करावे आणि मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली. “फोडाफोडीचे राजकारण करून देश चालणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संघाने आता आपली भूमिका स्पष्ट करावी. पूर्वी मुख्यमंत्री ठरवण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असायची. आता त्यांना फोडाफोडीचे राजकारण मान्य आहे का, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, भाजप आणि शिंदे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.