
जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून धरणाचे 4 दरवाजे 5 मिलिमीटरने उघडण्यात आले असून सध्या 5 हजार 368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यप्रदेश आणि विदर्भ भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यावर झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वेगाने पाण्याची आवक होत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकरी आणि ग्रामस्थांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.