
मुंबईतील साकीनाका परिसरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खैरानी रोड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अस्लम इसाक शेख असे असून, सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, विरोधकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत मॅनहोलची झाकणे बसवणे, जाळ्या बदलणे आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचे अर्थसंकल्प असतानाही मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या दुर्घटनेनंतर पावसाळी तयारीच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे.