
सध्या राज्यभर मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अशात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्खळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील छताचा तब्बल 50 ते 60 फुटांचा भाग मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही घटना रात्री उशिरा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनांची आणि प्रवाशांची वर्दळ कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
माहितीनुसार, रेल्वे स्थानकाच्या दुरुस्ती आणि बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षीही या छताला गळती लागल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तरीही आवश्यक दुरुस्ती वेळेत न झाल्याने अखेर छताचा मोठा भाग कोसळल्याचे बोलले जात आहे.
घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा प्रतिनिधी मनोज लेले यांनी घेतला.