
महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री नितेश राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकी नेहमीच चर्चेत असतात. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोन्ही नेते सहसा सोडत नाहीत. मात्र, मागील महिन्यात संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या कामाचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
राज्यात चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितेश राणे यांचा समावेश असल्याचे सांगत संजय राऊत यांनी त्यांची स्तुती केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
आता पुन्हा एकदा संजय राऊत आणि नितेश राणे चर्चेत आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी नितेश राणे यांना पत्र लिहिले आहे. मात्र, हे पत्र मैत्रीचे नसून उपरोधिक शैलीत लिहिलेले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
ठाकरे गटाच्या श्रीराम वाचवा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसपासून भाजपापर्यंतच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्राची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.