
सध्या राज्याच्या राजकारणात सतत काही ना काही सुरु आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली आहे. विरोधक या आपत्ती नियोजनावर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादारमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर केला हल्लाबोल. दरम्यान, राज ठाकरे यांनी सत्तेत असलेल्या लोकांच्या मुजोरीबद्दल देखील व्यक्तव्य केले आहे.
“ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर…”
कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. यात मी लक्ष घालतो. ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर चौकशी लावतो, असं बोलायला हवं होतं. ते राहिलं बाजूला. राजकारण करेल त्याला बघून घेईल. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस बघून घ्यायची कोणती भाषा आली. पण हे सुरू होतं. एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन. माझ्या नावावर पाच मर्डर आहे. आपल्या राज्यात होऊ शकतं. कारण ते सत्तेत आहेत.
“हे बोलायची हिंमत…”
पुढे संताप व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, हे बोलायची हिंमत होते. कारण कुणाचा कुणावर अंकूश नाही. जे काही महाराष्ट्रात सुरू आहे. तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. बाकीच्या ठिकाणचं सोडून द्या. रेल्वेत लक्ष द्या. फक्त रेल्वे येते आणि जाते एवढंच नाही. कोण घुसतंय ते पाहा. स्टॉलची टेंडर मराठी मुलांना मिळाली पाहिजे. प्रत्येक स्टेशनला मिळाली पाहिजे. यावर बारीक लक्ष हवं. हे लक्ष नसेल तर काय चाटायचे वर्धापन दिन. काय करायचा वर्धापन दिन. एकच सांगतो. जागे राहा. सतर्क राहा. आपला मराठी ठसा रेल्वेतून पुसला जाणार नाही यासाठी काम करा.
“चांगल्या गोष्टीत काय हवं, काय नको हे समजणारा समाज लागतो”
समाजाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, दुसरं महायुद्ध संपल्यावर सर्वांची वाहवा झाली. इंग्लंडची वाहवा झाली. विस्टन चर्चिलची वाहवा झाली. त्यांची एक मुद्रा होती हाताची व्ही फॉर व्हिक्ट्रीची. विस्टन चर्चिलचं कौतुक झालं. आठ महिन्याने निवडणुका झाल्या. चर्चिलचा पक्ष हारला. ज्याच्या नावावर युद्ध जिंकल्याची गोष्ट होती. तो हरला. पत्रकाराने लोकांना प्रश्न विचारलं असं काय झालं. तर लोक म्हणाले, युद्ध काळात तो योग्य होता. शांततेच्या काळात नाही. हे समजायला अक्कल लागते. याला लोकशाही म्हणतात. चांगल्या गोष्टीत काय हवं, काय नको हे समजणारा समाज लागतो. शिक्षण घेऊन उपयोग नाही. शिक्षित असून उपयोग नाही.माणूस सूज्ञ लागतो. बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या. पण त्या बोलून गेल्या. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बोलायला सूज्ञ लागतो माणूस. ज्या देशात समाज सुज्ञ असतो तेव्हाच प्रगती होते. तेही कामावर जातात. जगातील प्रत्येक माणूस कामावर जातो. पण तो विचार करतो. आपण नाही विचार केला तर कसं होईल.