
आयपीएल 2026 मध्ये अजूनपर्यंत तरी मुंबई इंडियन्सच्या टीमला सूर गवसलेला नाही. त्यांनी सलग तीन सामने गमावून पराभवाची हॅटट्रिक केली आहे. हार्दिक पंड्याचा संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुद्धा होतेय. मुंबईच्या खराब सुरुवातीमागे हार्दिकची कॅप्टन्सी हे एकमेव कारण असल्याचं काही क्रिकेट एक्सपर्ट्स मानतात. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याच्या निर्णयांमुळे टीमचा परफॉर्मन्स खराब होतोय असं टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सदागोपन रमेश म्हणाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिकने जे खराब निर्णय घेतले, त्याकडे सदागोपन रमेश यांनी लक्ष वेधलं. जसप्रीत बुमराहबद्दल कॅप्टन म्हणून हार्दिकने चुकीचा निर्णय घेतला असं रमेश यांना वाटतं. बुमराह टीममधला इकोनॉमिकल म्हणजे धावांना लगाम घालणारा गोलंदाज आहे. त्याला पावरप्लेमध्ये दोन ओव्हर्स दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे.
हार्दिकचं नेतृत्व हाच मुंबई इंडियन्सचा इश्यू आहे. हार्दिक खेळाडू म्हणून उत्तम आहे. पण कॅप्टन म्हणून नाही असं सदागोपन रमेश यांचं मत आहे. पावरप्लेमध्ये बुमराहला दोन ओव्हर देऊन त्याने चूक केली. दुसऱ्या बॉलरना मार पडत होता, म्हणून हार्दिकने बुमराहकडे चेंडू दिला. बुमराहने टीमची सहावी आणि व्यक्तिगत दुसरी ओव्हर टाकली. त्यानंतर तो थेट 17 व्या ओव्हरमध्ये आला. म्हणजे तुमचा बेस्ट बॉलर 60 चेंडू जवळपास 10 ओव्हर मध्ये नव्हताचं असं सदागोपन रमेश म्हणाले.
रजत पाटीदार विरुद्ध स्पिन गोलंदाज कसे वापरले?
आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार विरुद्ध स्पिनर वापरण्याच्या निर्णयावरही रमेशने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारण रजत पाटीदार स्पिन गोलंदाजी उत्तमरित्या खेळतो. सातवी आणि आठवी ओव्हर दोन्ही एन्डकडून हार्दिकने स्पिन गोलंदाज वापरले, ही त्याची चूक होती असं रमेश यांना वाटतं. 50 वर्षीय सदागोपन रमेश यांनी भारताकडून 19 टेस्ट आणि 24 एकदिवसीय सामने खेळले. हार्दिक पंड्याने मैदानावर घेतलेले काही निर्णय रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही पटलेले नाहीत असा दावा रमेश यांनी केला.
आजच्या मॅचमध्ये विजय आवश्यक
कॅप्टनसी करताना हार्दिक पंड्या गोंधळलेला दिसला. टिम डेविडला त्याने हाय फुल टॉस टाकला आणि त्यावर रिव्यू घेतला. सूर्यकुमार यादवला सुद्धा त्याच्या या निर्णयाने धक्का बसला. हार्दिकच्या मैदानातील अनेक निर्णयांशी रोहित शर्मा सुद्धा सहमत नसल्याचं दिसलं आहे असं रमेश म्हणाले. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना आहे. या मॅचमध्ये विजय आवश्यक आहे.