
सध्या सगळ्या देशात केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. 18 जून रोजी पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरुन पडून केतनचा मृत्यू झाला होता. केतनला ट्रेकिंगची आवड होती. सुरुवातीला हा ट्रेकिंग करताना झालेला अपघात वाटला. पण या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाबी उघड झाल्या. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला गडावरुन ढकलून संपवल्याचं स्पष्ट झालं. सिया आणि चेतनने मिळून केतनला संपवण्याचं कारस्थान रचलं होतं. सध्या हे दोघे पोलीस कोठडीत असून या प्रकरणी तपास सुरु आहे. समाजात सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा होत आहे. अभिनेत्री राजकारणी कंगना राणौतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून या विषयावर मत मांडलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सियाच्या वडिलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने असं म्हटलय की, “मुलांच्या कृत्यासाठी आई-वडिलांना जबाबदार धरु नये. सोशल मिडिया, AI आणि समवयस्कर लोकं यांचा माणसाच्या मनावर, निर्णयावर परिणाम होतो. त्यानंतर तुमच्या संगोपनाचा मुद्दा येतो” आपला मुद्दा पटवून देण्यासाठी तिने सिया गोयलच्या वडिलांची पोस्ट शेअर केली आहे.
एकाचवेळी अनेक समांतर आयुष्य जगत असतात
“सध्या असे दिवस आहेत की, कुटुंब, घर आणि पालकांकडे पाहून तुम्ही मुलांच्या संस्काराची खात्री देऊ शकत नाही. हे महत्वाचं आहे की, त्यांना कोण घडवतय?. ते कोणासोबत वेळ घालवतात. त्यांच्यावर सोशल मिडिया, एआयचा असलेला प्रभाव. पालकांना दोष देता येणार नाही. कारण मुलं एकाचवेळी अनेक समांतर आयुष्य जगत असतात. लोक त्यांच्या हिशोबाने जे त्यांना योग्य वाटतं तो दृष्टीकोन बनवतात. म्हणून मुलांच्या कृतीवरुन कुटुंबांचं मूल्यमापन करु नये” असं कंगना राणौतने लिहिलय.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही
कंगना नुकतीच भारत भाग्य विधाता चित्रपटात दिसली होती. त्यातल्या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही. केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दोघांच्या घरात लग्नाची तयारी सुरु असताना हा प्रकार घडला. या घटनेने मागच्यावर्षी घडलेल्या सोनम रघुवंशी प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.