
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचाली वाढल्या.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील 6 खासदारांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली. हे खासदार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते, अशीही चर्चा होती. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
ठाकरे गटाचा दावा आहे की, बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांपैकी खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय दिना पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर सहीच केलेली नाही. हे दोन्ही खासदार बुधवारी दिल्लीमध्ये उपस्थित नव्हते, असेही सांगण्यात आले. त्यामुळे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर अडचणीत आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.