
आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणारImage Credit source: PTI
BCCI on Impact Player Rule: आयपीएल 2026 स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू झाल्यापासून संघांची रणनिती बदलली. इम्पॅक्ट प्लेयर नियम 2023 पासून लागू झाला होता. या नियमासह आयपीएल स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी हा नियम लागू केला होता. मात्र या नियमामुळे क्रिकेटची खरी मजा निघून जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कारण सामना एखाद्याचा पारड्यात झुकला असताना इम्पॅक्ट प्लेयरमुळे सामन्याचं चित्रच बदलून जातं. सामन्याच्या परिस्थितीनुसार संघ आपली फलंदाजी किंवा गोलंदाजी खेळाडूत बदल करत आहेत. त्यामुळे योग्य रणनिती आखणं कठीण जात आहे. इतकंच काय तर अष्टपैलू खेळाडूचं महत्त्वही कमी झाला आहे. असं असताना बीसीसीआयने आता या नियमावर एक निवेदन जारी केलं आहे. आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा आढावा घेण्यासाठी योजना आखत आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की, हा नियम गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. स्पर्धा संपल्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल. सध्या त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. हा नियम लागू झाल्यापासून आयपीएल स्पर्धेत धावांचा वर्षावर होता आहे. आता 250 पेक्षा जास्त धावा करणं सामान्य बाब झाली आहे. सपाट खेळपट्ट्यांवर हा नियम फलंदाजांच्या फायद्याचा आहे. इतकंच काय गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जात आहे. 2024 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या नियमाविरुद्ध आवाज उठवला होता. रोहित शर्माने थेट मत मांडत हा नियम आवडत नसल्याचं सांगितलं. इतकंच काय तर विराट कोहलीनेही रोहित शर्माचं म्हणणं योग्य असल्याचं सांगितलं होतं.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, “काही सामने कमी धावसंख्येचे होत आहेत. सर्व चाहते सामन्यांचा आनंद घेत आहेत. गोलंदाजांनाही चांगल्या विकेट्स मिळत आहेत. तुम्ही धावफलक पाहिल्यास, काही संघ खूप कमी धावा करत आहेत आणि काही संघ तर 260 धावांचा पाठलागही करत आहेत. हे सर्व घडत आहे; हे एकाच पॅकेजमध्ये संपूर्ण चित्र आहे.”
देवजित सैकिया पुढे म्हणाले, “हा नियम गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही त्याचा आढावा घेऊ आणि स्पर्धेच्या मध्यभागी आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मी अधूनमधून माध्यमांमध्ये याबद्दल वाचले आहे. पण जर संघांकडून अशी विनंती आली, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पण अद्याप अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही.”