
कुडाळ तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित धर्मांतराच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात प्रार्थना सभांच्या माध्यमातून धर्मांतर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.
गुरववाडीतील एका भाड्याच्या घरात काही ख्रिश्चन मिशनरी गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना सभा घेत असल्याचे समोर आले आहे. या सभांमधून स्थानिकांना आमिष दाखवून किंवा अंधश्रद्धा पसरवून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. काहींना घरातील देवतांच्या मूर्ती काढून टाकण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान ग्रामस्थ आणि ख्रिस्ती मिशनरीच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं समोर आलं आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि संबंधितांशी शाब्दिक वाद झाला. ग्रामस्थांनी मिशनऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा दिला. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सागितलं जात आहे.