
गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी विमानचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कधी विमानातील बिघाडामुळे तर कधी धावपट्टीवरील अडचणींमुळे अनेकदा एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. पण नुकताच एक अशी घटना समोर आली आहे जिची देशभरात चर्चा होत आहे. विमान प्रवासादरम्यान एका तरुणाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. ते पाहून इंडिगो फ्लाइटच्या पायलटने मोठा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
उड्डाणादरम्यान विमानात सवार एका २९ वर्षीय प्रवाशाची तब्येत अचानक अत्यंत बिघडली. तो फुफ्फुसाच्या (लंग्स) आजाराच्या उपचारासाठी आपल्या बहिणीसोबत अहमदाबादला गेला होता आणि तिथून परतत होता. विमान जेव्हा जबलपूरच्या आकाशात होते, तेव्हा त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पायलटने तातडीने डुमना एअरपोर्टच्या एटीसीशी (ATC) संपर्क साधला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.
विमान लँड होताच एअरपोर्ट प्रशासन आणि विमान कंपनीने तातडीने रुग्णवाहिका (एम्ब्युलन्स) बोलावून रुग्णाला जबलपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही रात्री उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला.
५० मिनिटे विमान उभे
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे हे विमान जेव्हा डुमना एअरपोर्टच्या वरून जात होते, तेव्हाच ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीप कुमार गौनिश (रा. रांची, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) यांची तब्येत विमान प्रवासादरम्यान खालावली होती. त्यांच्या उपचारासाठीच पायलटने विमान जबलपूर विमानतळावर उतरवले. इमर्जन्सी लँडिंगमुळे हे विमान सुमारे ५० मिनिटे जबलपूर विमानतळावर उभे होते. त्यानंतर विमानाने रांचीसाठी उड्डाण केले.