
Bollywood Song : 1990 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत रोमँटिक ड्रामा चित्रपटांची जणू लाटच आली होती. त्या काळात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुछ-कुछ होता है’. आजही या चित्रपटाची जादू कायम असून त्यातील गाणी, संवाद आणि कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टायटल सॉंगबाबत एक रंजक किस्सा समोर आला आहे.
आज ‘कुछ कुछ होता है’ हे गाणं हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार गाण्यांमध्ये गणलं जातं. मात्र हे गाणं तयार होण्यापूर्वी करण जोहर यांनी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना हे गाणं लिहिण्याची विनंती केली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यामुळे करण जोहर खूप निराश झाले होते.
मनाला भिडणारं गाणं
यानंतर गीतकार समीर अंजान यांच्याकडे या गाण्याची जबाबदारी आली. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ‘करण जोहरचा हा पहिलाच चित्रपट होता आणि तो खूप तणावात होता. मला वाटलं की जावेद अख्तर यांच्याकडे चित्रपट गेला होता, म्हणजे गाण्यात शायरी आणि अवघड शब्दांची अपेक्षा असेल. त्यामुळे मी सुरुवातीला थोडं कठीण गाणं लिहून नेलं.’
मात्र करण जोहरने ते ऐकल्यानंतर समीर यांना स्पष्ट सांगितलं की, ‘मला अवघड शब्द नकोत. साधे, थेट आणि लोकांच्या मनाला भिडतील असे शब्द हवे आहेत.’ त्यानंतर समीर अंजन यांनी काही दिवसांचा वेळ घेतला आणि ‘कुछ कुछ होता है…’ हे मुखडं तयार करून आणलं. हे गाणं ऐकताच करण जोहर अक्षरशः आनंदाने उड्या मारू लागला. त्याला हवं होतं तसंच साधं आणि हृदयाला भिडणारं गाणं त्याला मिळालं होतं. समीर अंजन यांनीही सुरुवातीला हे गाणं खूप साधं वाटत असल्याचं सांगितलं, पण करण जोहरला खात्री होती की हेच गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करेल. आणि तसंच झालं.
चित्रपटाने केलेली प्रचंड कमाई
28 वर्षांनंतरही ‘कुछ कुछ होता है’ हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. आजही अनेक कार्यक्रम, पार्टी आणि सोशल मीडियावर हे गाणं ऐकायला मिळतं. या चित्रपटातील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं होतं.
बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. रिपोर्टनुसार, सुमारे 10 ते 14 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात जवळपास 47 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 100 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करत त्या काळात मोठा विक्रम केला होता.