
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने करून मराठा समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले आहेत. गेल्या 2-3 वर्षांत केलेल्या आंदोलनात त्यांना चांगले यश मिळाले आहे. मात्र सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारची झोप उडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकले असून अंतरवाली सराटीतून आंदोलनाची उद्या घोषणा केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्या आंदोलनाची तारीख ठरणार
समोर आलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी अंतरवाली सराटी येथे जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेच. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. कारण कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट आणि आंदोलकांवरील गुन्हे यासारख्या विषयांवरून जरांगे यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
जरांगे पाटलांचा सरकारला सवाल
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला प्रश्न विचारताना म्हटले की, ‘8 महिने उलटून गेले असले तरीही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? सातारा संस्थानचा जीआर 1 महिन्यात काढू म्हटले होते, का नाही काढला? राज्यातील सगळे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, का नाही घेतले? शिवाय शिंदे समितीची मुदत वाढ आणि शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे, त्यामुळे उद्या आंतरवाली सराटीतून जरांगे पाटील काय बोलणार आणि काय त्यांची पुढची भूमिका असणार याकडे सर्वांचाच लक्ष लागले आहे.
मराठा समाजाचे जरांगे पाटलांच्या आवाहनाकडे लक्ष
मनोज जरांगे यांच्या उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात मराठे पुन्हा एकदा मुंबईकडे कुच करणार आहेत. आज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नेकनूरला बळी गेलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्या जरांगे पाटील नेमकं काय बोलणार आणि मराठ्यांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे.