
सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वार वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका सुरुवातीला काँग्रेसने घेतली होती. मात्र बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे. गुरुवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे.
नेमकं काय म्हणाले सपकाळ?
काँग्रेसची मनधरणी करण्यात अखेर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश आलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार देण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती असंही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट करताना सुरुवातील म्हटलं होतं की, जर उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबाद देऊ, मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून अंबदास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. तसेच उमेदवार देण्याचे संकेत देखील दिले होते. मात्र त्यानंतर आता काँग्रेसची तलावार मॅन झाल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसने अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.