
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर ठाकरे कुटुंबाचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आता लवकरच काही आमदार ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार आहेत, असा दावा केला जातोय. या सर्व घडामोडीमुळे ठाकरेंच्या पक्षात सध्या अस्थिरता आहे. पक्षाला पुन्हा एकदा उभारी मिळावी, कार्यकर्त्यांना बळ मिळावे यासाठी ठाकरे राज्यभर फिरत आहेत. आथा ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. याच आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
राम भक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर आर्थिक घोटाळ्यावरून भाजपावर सडकून टीका केली. तसेच रविवारी (5 जुलै) मुंबईतील दादरमधील कबुतरखान्याजवळ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या भागात एक रा मंदिर आहे. याच राम मंदिराजवळ समस्त राम भक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. ठाकरेंच्या याच आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या पक्षाची शकलं का झाली, याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली
देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी फडणवीस यांना ठाकरेंच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना शेवटी उद्धवजींना राम आठवले आहेत. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजेत. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.
ठाकरेंच्या आंदोलनात नेमकं काय होणार?
तसेच, राममार्गाने चालले तर त्यांचं भलं होईल. त्यांनी आजच्या पुरतीच नव्हे तर रोज रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दरम्यान, आता ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारला घेरलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या आंदोलनात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.