
उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात जमीन तापते. साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णता सहन होत नाही आणि ते बिळातून बाहेर पडतात. बिळातून बाहेर पडलेला साप हा आपल्याला लपण्यासाठी सुरक्षीत जागा शोधत असतो. थंड आणि थोडासा अंधार असलेली जागा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सापांना सर्वात जास्त आवडते. त्यामुळे साप नेहमी अशा जागेच्या शोधात असतात. अनेकदा अशी जागा सापांना आपल्या घरात सापडते. त्यामुळे साप आपल्या घरात घुसतात. आपण बेसावध असल्यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता आवढते,
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकांना बाग कामाची आवड असते, उन्हाळ्यामध्ये आपण झाडांना अधिक पाणी देतो त्यामुळे जमीन ओली असते. अशावेळी जमीन जिथे ओली असेल तिथे साप झाडाच्या आडोशाला आश्रय घेतात, साप स्वत:हुन कधीही एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाहीत, मात्र त्यांना धोका जाणवल्यास ते आपल्यावर हल्ला करू शकतात. तसेच त्यांना जर वाटलं तुम्ही त्यांची शिकार आहात तरी देखील ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे या काळात आपल्या बागेमध्ये देखील साप निघण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील.
तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा बागेमध्ये लावलेल्या काही वनस्पती अशा देखील असतात, ज्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप त्यांच्याकडे आकर्षित होतो, आणि अशा झाडांखाली आश्रय घेतो. त्यामुळे अशा वनस्पती बागेत लावताना काळजी घेणं गरजेचं असतं. शक्यतो या वनस्पती घरात लावूच नये आणि लावली तर योग्य खबरदारी घ्यावी. आज आपण ज्या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. ती वनस्पती म्हणजे जुईचा वेल आहे. जुईला सुवासिक फुल येतात. हा वेळ मोठ्या प्रमाणात पसरतो त्यामुळे तिथे अडचण तयार होते. जुई 12 महिने देखील हिरवीगार राहत असल्याने सापांना या वेलीमध्ये थंडावा मिळतो. तसेच लपण्यासाठी पुरेशी जागा देखील उपलब्ध होते. त्यामुळे या वेलीच्या आसपास किंवा वेलीमध्ये अनेकदा साप आढळून येतात. त्यामुळे या वेलीची वेळोवेळी कटिंग होणं महत्त्वाचं असतं.