
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये भारतात सुमारे 33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात रितेशने मुख्य भूमिका केली असून सलमान खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त या दिग्गज कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता रितेश देशमुखने या कलाकारांनी चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतले याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
… म्हणून चित्रपट काढला
रितेश देशमुखने म्हटले की, मागच्या 10 वर्षाचा प्रयत्न होता की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर काहीतरी करावं, त्या साठी हा चित्रपट काढला. जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो महाराजांचा विषय असतो, तेव्हा बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गोष्टी मांडाव्या लागतात. सर्वात चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं लिखाण होतं. कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आणि कोणत्या गोष्टीवर कमी लक्ष द्यायचे हे महत्त्वाचे होते.
बड्या कलाकारांनी किती मानधन घेतलं?
महाराष्ट्रात सर्वात जास्त स्क्रीन या मराठी चित्रपटाला मिळाल्या आहेत. आम्ही सर्व पुस्तक वाचली, महाराजांचा इतिहास हा एका चित्रपटात मावणारा नाही. इतिहासाशी तडजोड न करता हा चित्रपट दाखवणं आमचा काम होतं. सलमान खान माझे भाऊ आहेत ते माझ्या दोन्ही चित्रपटात होते. साडे तीन वर्षांपासून मी चित्रपट लिहण्यावर काम करत होतो. या चित्रपटात सर्व मोठ्या अभिनेत्यांनी मोफत काम केलं आहे, महाराजांसाठी सर्वांनी मोफत काम केलं आहे. हा चित्रपट आम्ही हिंदी आणि मराठीमध्ये प्रसारित केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, हा चांगला योग आहे संपर्ण परिवार व लहान मुलांना महाराजच बद्दल महिती या चित्रपटातून मिळेल.
कोणत्या कलाकाराने कोणती भूमिका साकारली?
राजा शिवाजी चित्रपटात सलमान खानने शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चनने मोठ्या भावाची भूमिका साकारली, तर संजय दत्तने अफझल खानची व्यक्तिरेखा रंगवली आहे. तसेच महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.