
Deepti Sharma Pratika Rawal and Avishkar Salvi Team IndiaImage Credit source: TV9
देशातील सर्वात मोठ्या टीव्ही 9 या न्यूज नेटवर्कच्या वतीने सत्ता सम्मेलन 2026 चं आयोजन करण्यात आलं. या सत्ता सम्मेलनात मेन्स आणि वुमन्स टीम इंडियातील आजी माजी खेळाडू सहभागी झाले. या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचे अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या वर्ल्ड कप विजेते खेळाडूंनी क्रिकेटमधील प्रवासावार भाष्य केलं. तसेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही रोखठोकपणे आपली मतं मांडली. गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? यावर उत्तर न देता त्याने ते दोघे कसे भारी आहेत हे सांगितलं.
मेन्सनंतर या कार्यक्रमात वुमन्स टीम इंडियातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ओपनर प्रतिका रावल आणि ऑलराउंडर दीप्ती शर्मा या सत्ता सम्मेलनात सहभागी झाल्या. तसेच वुमन्स टीम इंडियातील सपोर्ट स्फाटमधील सदस्य आणि माजी क्रिकेटपटू अविष्कार साळवी हे देखील उपस्थित होते. या सम्मेलनात दीप्ती आणि प्रतिकाने वर्ल्ड कप विजयांनतर आयुष्यात कसा आणि काय बदल झाला? याबाबत भाष्य केलं. टीम इंडियाने नोव्हेंबर 2025 मध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. वुमन्स टीम इंडियाची ही पहिलीच आयसीसी ट्रॉफी ठरली.
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन
टीम इंडिया 2 नोव्हेंबरला वर्ल्ड चॅम्पियन ठरली. अंतिम सामन्याच्या दिवशी डोक्यात काय सुरु होतं याबाबत दीप्तीने सांगितलं. “अंतिम सामन्यात खेळताना आयुष्यात या पेक्षा चांगला क्षण येऊ शकत नाही. अंतिम सामन्याच्या 1 दिवसआधी घरी भावाला फोन करुन आम्हीच वर्ल्ड कप जिंकू असं म्हटलेलं. भारतात वर्ल्ड कप होत आहे, त्यामुळे चांगलंच करायचं, हाच विचार होता”, असं दीप्तीने म्हटलं.
दीप्तीने या दरम्यान तिच्यावर टीका करणारेच तिचे गोडवे गाऊ लागल्याचं सांगितलं. “वर्ल्ड कप विजयानंतर माझं आयुष्य बदललं आहे. आता मला घरी थांबायला फार वेळ मिळत नाही. चाहत्यांचा सपोर्ट मिळतो. घरी परतल्यानंतर स्वागत करणाऱ्यांमध्ये टीकाकारच जास्त असतात, तेच आता गळ्यात हार घालतात”, असंही दीप्तीने म्हटलं.
प्रतिका रावल काय म्हणाली?
प्रतिका रावल हीला या सम्मेलनात बॉस्केटबॉल सोडून क्रिकेट निवडण्याचा निर्णय कसा घेतला? याबाबत प्रश्न करण्यात आला.
” मी सुरुवातीपासूनच क्रीडा क्षेत्रात होती. मी सर्वात आधी क्रिकेटच खेळले. मात्र चौथीत असताना बास्केटबॉल निवडलं. मी क्रिकेट आणि बास्केटबॉल एकत्र खेळत होते. जेव्हा बॅट पकडायचे तेव्ही मी वेगळी आहे असं वाटायचं”, असं प्रतिकाने म्हटलं.
“एकदा बास्केटबॉल आणि क्रिकेटच्या दोन्ही स्पर्धा एकत्र आल्या. एकाच वेळेस दोन्ही स्पर्धेत खेळणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मी क्रिकेट निवडलं. मी वयाच्या 17-18 व्या वर्षी प्रोफेशनली क्रिकेट खेळायची सुरुवात केली. मला टीम इंडियासाठी खेळायला मिळेल असा मी विचार केला आणि तसंच झालं”, असं प्रतिकाने नमूद केलं.