
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते रंजित बालकृष्णनवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली असून बुधवारी न्यायालयाने त्याला 13 एप्रिल 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोची पोलिसांनी रंजितला इडुक्कीमध्ये अटक केली. त्यानंतर चौकशी करून त्याला एर्नाकुलमच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. 30 जानेवारी रोजी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोकेशनवरील व्हॅनिटी व्हॅनमध्ये लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर FIR
रंजित बालकृष्णनला पोलिसांनी जेव्हा 31 मार्च रोजी ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याने प्रकृती अस्वस्थ असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला आरोग्याच्या तपासणीसाठी एर्नाकुलम जनरल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तपासणीनंतर रंजितला कुठलीही गंभीर आरोग्याची समस्या नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यानंतर रंजितला कोर्टासमोर हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण एका अशा घटनेशी संबंधित आहे, जी कथितरित्या एका चित्रपटाच्या सेटवर घडली होती. पोलिसांनी रंजितच्या जुन्या प्रकरणांचाही कोर्टात उल्लेख केला होता. त्याच्यावर अशा पद्धतीचे गंभीर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
याआधीही गंभीर आरोप
याआधी 2024 मध्ये एका बंगाली अभिनेत्रीने रंजितवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हा सांगितलं गेलं होतं की 2009 मध्ये एका चित्रपटाच्या चर्चेदरम्यान रंजितने अभिनेत्रीशी गैरवर्तन केलं. त्यावेळी सुद्धा त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. रंजीत बालकृष्णन हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे. त्याने 2001 मध्ये ‘रावणप्रभू’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत तीन वेळ राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार
यात त्याच्या ‘स्पिरीट’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाला सामाजिक मुद्द्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्याच्या ‘तिराक्काथा’ आणि ‘इंडियन रुपी’ या चित्रपटांनाही 2008 आणि 2011 मध्ये मल्याळम भाषेतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. रंजितने सहा वेळा केरळ राज्य चित्रपट पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत.