
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणी राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय केवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नव्हे, तर इतर पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात चार पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सादर करत हा घातपात असल्याचा दावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर कर्नाटकात या प्रकरणी झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, महाराष्ट्रात अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अजितदादांचा फोन सापडला, मात्र विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तपास यंत्रणांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सुळे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अपघाताला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ब्लॅक बॉक्सबाबत कोणतीही अधिकृत माहिती न दिल्याने संशय अधिकच बळावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.