
राज्यातील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा स्तर घसरत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “मी कुठलाही चुकीचा शब्द वापरलेला नाही. तो शब्द लक्षण दर्शवणारा असून संस्कृतमधील ‘दरिद्री’ या शब्दापासून तयार झालेला आहे. मोदी सत्तेत आल्यापासून शेतमालाचे दर घसरले, बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले आणि भ्रष्टाचार बोकाळला. त्या संदर्भात मी वक्तव्य केलं.” तसेच, “जर भाजपला तो शब्द खटकत असेल तर नरेंद्र मोदी हे ‘पनोती’ आहेत, असा शब्दप्रयोग करतो,” असंही सपकाळ यांनी म्हटलं.
यावेळी सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. “सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी अवस्था झाली आहे. कांद्याला 24 रुपये भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे,” असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.