
राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, नेते हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील हजर होते. या बैठकीत नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, या बैठकीला अनेक मंत्री उपस्थित होते. एमएसपीचा दर वाढवण्यामध्ये लवकरच निर्णय होईल. 10 दिवसांमध्ये याबाबत निर्णय होईल असं अमित शहा यांनी आम्हाला सांगितलं आहे. तुम्ही आनंदाने जावा, निर्णय आम्ही करू असं त्यांना आजच्या बैठकीत सांगितलं आहे. दुसरी मागणी आम्ही केली होती की इथेनॉलचा कोटा वाढवून द्या. यावरही त्यांनी कोटा वाढवून देण्यास होकार दिला आहे. साखरेचा दर आणि इतरही अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी काय म्हटले?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले की, कांदा आणि साखर उद्योगावर सकारात्मक चर्चा झाली आहे. 10 दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय होईल असं अमित शाह यांनी सांगितलं आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. आम्ही या बैठकीवर समाधानी आहोत. कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि इतरही अनेक अधिकारी हजर होते. यावेळी सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. कांदा निर्यात देखील उठवली असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.
कांदा निर्यातबंदी उठवणार
दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही अशी तक्रार होती. यावत अमित शहांनी सांगितले अशी कोणतीही निर्यातबंदी नाही, आणि जरी निर्यात बंदी असली तरी मी उद्या सकाळपर्यंत ती उठवेल. त्यामुळे बंदी नसेल. तसेच अधिक कांदा खरेदी केंद्रे सुरू होतील असं शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटले आहे अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.