
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त बऱ्याच वर्षानंतर तो दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करत आहे. सोशल मीडियासोबतच तो प्रियदर्शनसोबत देशातील विविध शहरांमध्ये या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. नुकतंच दिल्लीत या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अक्षयने त्याचा मुलगा आरवशी संबंधित एक किस्सा सांगितला.
अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अक्षय कुमारने सांगितलं की ‘भूत बंगला’ हा ‘भुल भुलैया’ या चित्रपटापेक्षा किती वेगळा आहे? यावेळी अक्षयने एक किस्सासुद्धा सांगितला. 2007 मध्ये ‘भुल भुलैया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या मुलाची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा अक्षयने केला.
“मी माझा मुलगा आरवशी बोलत होतो, तेव्हा त्याने मला सांगितलं की जेव्हा त्याने भुल भुलैया हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला. त्यानंतर सहा वर्षांपर्यंत तो अभिनेत्री विद्या बालनला घाबरत होता. जेव्हा कधी ती घरी यायची तेव्हा आरव तिला भेटायला नकार द्यायचा. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हता. खरं तर माझ्या मुलाला विद्या बालनमध्ये नेहमीच मंजुलिकाची झलक दिसायची. तिच्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागला होता. विद्याला पाहून तो अधिकाधिक अस्वस्थ व्हायचा.”
अक्षयने पुढे हे देखील सांगितलं की, त्याने त्याच्या मुलाला या भीतीतून कसं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला? तो म्हणाला, “मला आरवला समजावून सांगावं लागलं की विद्या बालन ही मंजुलिका नाही तर ती विद्या बालन आहे आणि ती एक चांगली व्यक्ती आहे. तरीही त्याचा त्यावर कधीच विश्वास बसला नाही. सहा वर्षांपर्यंत तो तिला घाबरूनच होता. त्याच्या मनात विद्या विषयी प्रचंड भीती होती.”
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैया’ या चित्रपटात विद्या बालनने मंजुलिकाची भूमिका साकारली होती. ‘भूत बंगला’ आणि ‘भुल भुलैया’ यांच्यातील फरक स्पष्ट करताना अक्षय म्हणाला की, ‘भूत बंगला’ हा साएंटिफिक चित्रपट आहे तर ‘भुल भुलैया’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता.