
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा थरारक अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
या विजयानंतर चॅम्पियन ठरलेल्या आरसीबी संघाला बक्षीस म्हणून तब्बल २० कोटी रुपये मिळाले. यानंतर अनेक क्रिकेट चाहते ही कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम नक्की कोणाच्या खात्यात जाते? असा प्रश्न विचारताना दिसतात. अनेकदा मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंना हे पैसे मिळतात की संघाच्या अब्जाधीश मालकांना? आज आपण बीसीसीआयचा (BCCI) याबाबातचा नेमका नियम काय याबद्दल जाणून घेऊया.
आयपीएल अंतर्गत मिळणाऱ्या बक्षीस रकमेच्या वितरणाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अत्यंत कडक आणि स्पष्ट नियम आखले आहेत. या नियमांनुसार, कोणतीही फ्रँचायझी संपूर्ण बक्षीस रक्कम स्वतःकडे ठेवू शकत नाही.
संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी मैदानावर कठोर परिश्रम करणाऱ्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला या रकमेतील एक निश्चित हिस्सा देणे फ्रँचायझीवर बंधनकारक आहे. बक्षीस रकमेचे समसमान ५०:५० फॉर्म्युला वापरला जातो.
विजेत्या संघाला मिळणारी २० कोटी रुपयांची रक्कम मुख्यत्वे दोन भागांत विभागली जाते. या एकूण रकमेतील ५० टक्के म्हणजेच १० कोटी रुपये फ्रँचायझी मालकांच्या खात्यात जातात. तर उर्वरित ५० टक्के म्हणजेच १० कोटी रुपये संघातील सर्व खेळाडू, मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात समान पद्धतीने वाटून दिले जातात.
खेळाडूंना मिळणारी ही रक्कम त्यांच्या मूळ आयपीएल मानधनापेक्षा (Salary) पूर्णपणे वेगळी म्हणजेच बोनस स्वरूपात असते. फ्रँचायझी मालक केवळ या १० कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत नाहीत. बक्षीस रकमेव्यतिरिक्त मालकांच्या कमाईचे इतर काही स्त्रोतही असतात. यात मिडिया राइट्स, स्पॉन्सरशिप, तिकीट विक्री, मर्चेंडाइज विक्री यातूनही संघाला फायदा होतो.