
राजस्थान रॉयल्सच्या टीममधील एका 15 वर्षाच्या मुलाने जागतिक क्रिकेटमध्ये वादळ आणलय. वैभव सूर्यवंशी जगातील दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढतोय. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 37 चेंडूत 103 धावा फटकावल्या. यात 5 फोर आणि 12 सिक्स होत्या. एकीकडे वैभव कमाल करतोय. पण दुसरीकडे त्याच्याच टीमचा कॅप्टन रियान पराग चुकीचे निर्णय घेतोय. त्यामुळे वैभवच्या मेहनतीवर पाणी फिरतय. कालच्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने 228 धावांचा डोंगर उभारला. पण सनरायजर्स हैदराबादने हे लक्ष्य पार केलं. रियान परागच्या नेतृत्वावर भारताचा माजी ओपनर विरेंद्र सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रियान परागला कॅप्टन बनवण्याच्या आपल्या निर्णयाचा फ्रेंचायजीने पूनर्विचार करावा असं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. रियान पराग कॅप्टन झाल्यापासून फलंदाज म्हणून अपयशी ठरतोय. कर्णधार म्हणून त्याने घेतलेले काही निर्णय विरेंद्र सेहवागला पटलेले नाहीत. “राजस्थान रॉयल्सने रियान परागच्या कॅप्टनशिपबद्दल विचार करावा. तो टीमसाठी योग्य कॅप्टन आहे का? याचा मॅनेजमेंटने विचार करावा” असं सेहवागने म्हटलं आहे.
त्यांना फक्त एक ओव्हर देणं ही मोठी चूक
SRH कडून राजस्थानचा पराभव झाल्यानंतर सेहवागने परागच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सेहवागच्या मते रियान परागने विकेट टेकर गोलंदाज रवी बिश्नोई आणि रवींद्र जाडेजा यांचा योग्य पद्धतीने वापर केला नाही. “बिश्नोई आणि जडेजा यांनी फक्त एक-एक ओव्हर टाकली. तू त्यांना अजून एक ओव्हर द्यायला पाहिजे होती. जर, तू त्यांना फक्त एक ओव्हर देणार मग विकेट कोण काढणार?. बिश्नोई आणि जडेजाने गोलंदाजी केली असती, तर त्यांनी विकेट काढण्याचा प्रयत्न केला असता” असं सेहवाग म्हणाला. रवी बिश्नोई आणि रवींद्र जडेजा हे प्लेयर टीम इंडियाकडून खेळतात. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्यांना फक्त एक ओव्हर देणं ही मोठी चूक आहे.
..तर माझ्या नेतृत्वावर परिणाम होणार
“कॅप्टनने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीवर अवलंबून राहण्याऐवजी जास्त जबाबदारी घेतली पाहिजे” असं सेहवाग म्हणाला. “मी कॅप्टन आहे, फलंदाज आहे. मी धावा बनवत नाहीय, तर माझ्या नेतृत्वावर परिणाम होणार. मी हा विचार करीन की, वैभव सूर्यवंशीने जर 36 चेंडूत शतक ठोकलं, तर मी एक सिनियर खेळाडू आहे. मी का धावा करत नाहीय?” असं सेहवाग म्हणाला.