
राज्यातील गुन्हेगारीच्या आणि अत्याचाराच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता प्रेमसंबंधांतील दुराव्यातून आणि रागाच्या भरात माणसाचा संयम सुटल्याने किती टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, याचा प्रत्यय पुण्यातील चंदननगर भागात आला आहे. आपल्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरल्याचे सहन न झाल्याने एका तरुणीने तरुणाचा प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप राठोड असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने उजालादेवी दोहरे या २२ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केला. दुर्दैवाने, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीचा मृत्यू झाला. यामुळे एका सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीचा शेवट रक्तरंजित झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत उजालादेवी आणि आरोपी दिलीप हे दोघेही पुण्यातील एका नामांकित शॉपिंग मॉलमध्ये कामाला होते. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. ही ओळख मैत्रीत बदलली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, उजालादेवी काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी गेली होती. तिथे तिच्या पालकांनी तिच्यासाठी लग्नाचे स्थळ शोधले. तिचा विवाह निश्चित केला.
उजालादेवीने ही माहिती दिली तेव्हा दिलीपला मोठा धक्का बसला. त्याने तिला हे लग्न मोडण्यासाठी वारंवार दबाव टाकला. मात्र कौटुंबिक निर्णयापुढे उजालादेवी ठाम राहिली. याच रागातून दिलीपच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती.
यानंतर २९ एप्रिलला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिलीप उजालादेवी राहत असलेल्या चंदननगर येथील घरात गेली. तेव्हा दिलीप तिथे पोहोचला. त्या दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात दिलीपने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने उजालादेवीच्या गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर सपासप वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून येईपर्यंत आरोपी तिथून पसार झाला होता.
उपचारादरम्यान मृत्यू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उजालादेवीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती खालावत गेली. अखेर उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपास पथके रवाना केली होती.
पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी दिलीप राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुण्यातील आयटी आणि व्यावसायिक परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.