
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला मुंबईत अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून मुरबाडकडे जात असताना अवघ्या 15 मिनिटांत हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास एकनाथ शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून मुरबाडकडे रवाना झाले होते. एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी ते प्रवास करत होते. मात्र ऐरोली परिसरात पोहोचताच हेलिकॉप्टर अचानक धुळीच्या वादळात अडकले.
परिस्थितीचा अंदाज घेत पायलटने तत्काळ सतर्कता दाखवत शिंदे यांना संभाव्य धोक्याची माहिती दिली. समोरून येणारे वादळ लक्षात घेऊन पुढील प्रवास धोकादायक ठरू शकतो, असा निर्णय घेत हेलिकॉप्टर वळवण्यात आले. त्यानंतर जुहू येथील पवन हंस विमानतळावर हेलिकॉप्टरची सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.
यानंतर एकनाथ शिंदे हे सुरक्षितपणे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी परतल्याची माहिती समोर आली आहे.