
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत इंधन बचत आणि प्रशासकीय काटकसरीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना विविध उपाययोजना तात्काळ अमलात आणण्याचे निर्देश दिले.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांनी आपापल्या वाहन ताफ्यात तात्काळ 50 टक्के कपात करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच खासगी स्वरूपाचे असले तरी परदेश दौरे टाळावेत, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितले. शासकीय कामकाजासाठी विशेष विमानं आणि हेलिकॉप्टरचा वापर टाळून आवश्यकतेनुसार नियमित विमानसेवेचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः मोटरसायकलचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिल्याचेही बैठकीत नमूद केले. “प्रत्येकाने ठरवून आठवड्यातील किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा,” असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील बैठका शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या उपाययोजनांमुळे इंधन बचत, परकीय चलन बचत आणि प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.